“शरद पवार-अमित शहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही”
ठाणे – शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रफुल पटेल आणि शरद पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या खास मर्जीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही. शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत, असं आव्हाड म्हणाले.
वाचा :-सुएझ कालव्याने घेतला मोकळा श्वास! एव्हर गिव्हन जहाज काढण्यात अखेर यश
ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिले आहेत. आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे यांच्याशीही शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आला आहे. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, ‘अॅंटिलिया’ प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.