यवतमाळमध्ये अवैधरित्या बनवलेले तब्बल ४ कोटी रुपयांचे बियाणे जप्त
यवतमाळ – जिल्ह्यातील पेरणीचा मोसम तोंडावर आला असताना बोरी अरब येथील बीज प्रक्रिया केंद्रावर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. कृषी विभागाने तब्बल ४ कोटी रुपये किंमतीचे बेकायदेशीररित्या बनवलेले बियाणे जप्त केले असून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्य तूर, सोयाबिन, हरभरा बियाण्यांचा समावेश आहे. बोरी अरब येथील धारतीधन सिड्स प्रोसेसिंग प्लांटमध्ये हे अवैधरित्या बियाणे तयार केले जात होते.
हे बियाणे बनविताना खुल्या बाजारातील सोयाबीन, तूर, चना विकत घेतला जायचा आणि तो कंपनीच्या बॅगमध्ये भरून शेतकऱ्यांना विकला जायचा. याबाबतची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी तत्काळ याठिकाणी धाड टाकली.त्यावेळी या बीज केंद्रात ८५० क्विंटल सोयाबीन, तूर बियाणे, ६६० क्विंटल लूज सोयाबीन, १७७९ क्विंटल लूज तूर, २७०० क्विंटल चना आणि ट्रकमध्ये भरलेले २२५ क्विंटल सोयाबीन आढळून आले.या मालाची किंमत अंदाजे ४ कोटी २५ लाख रुपये आहे.