“अजित पवारांच्या आत्मचरित्रात अनेक गोष्टी बाहेर येतील”; संजय राऊत
शपथविधीला ३ वर्ष झालीत त्यामुळे पुन्हा तो मुद्दा चर्चेत घेण्याची गरज नाही
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चांगलाच गाजला होता. मात्र हा शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्याची खेळी होती असं विधान काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा पहाटेच्या शपथविधीच्या चर्चांना उधान आलं आहे.
पहाटेच्या शपथविधीला ३ वर्ष होऊन गेली. त्यामुळे Chapter is close. जेव्हा अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील त्यात अनेक गोष्टी येतील. तसेच ही वेळ सगळं सांगण्याची नाही. शरद पवारांनी जे सांगितले ते पुरेसे आहे. या घटनेला ३ वर्ष झालीत त्यामुळे पुन्हा तो मुद्दा चर्चेत घेण्याची गरज नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्व आहे. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, असं जयंत पाटील म्हणाले होते.