संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले..
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची तिरडी बांधल्याचं विधान केलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांचे १६ आमदार अपात्र ठरतील याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची तिरडी बांधली आहे. ही राजकीय तिरडी आहे. आता फक्त ‘हे राम’ म्हणायचं बाकी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रामदास कदम म्हणाले, कुणाला राजकीय दृष्ट्या कायमचं स्मशानात जायला लागेल याचं दूध का दूध, पानी का पानी होईलच. निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची यावर शिक्कामोर्तब केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून संजय राऊतांची पोपटपंची चालू आहे. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळवताय. यापेक्षा जास्त काय आहे तुमचं? तुम्ही फक्त देव पाण्यात ठेवून बसला आहात.
हेही वाचा – लोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्प अहवाल महिन्याभरात तयार करण्याचे अजित पवार यांचे निर्देश
यावेळी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही लक्ष केलं आहे. आदित्य ठाकरेंवर मी बोलणं योग्य होणार नाही. उद्धव ठाकरेंवर बोलेन मी. आदित्य ठाकरेंची एवढी उंची नाही की मी त्यांच्यावर बोलावं. आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हते. पण आता एकनाथ शिंदेंनी त्यांना असं कामाला लावलंय की बापही पळतोय आणि बेटाही पळतोय, असंही रामदास कदम म्हणाले.