‘देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य’; संजय राऊत
शरद पवारांची मान्यता असती, तर ते सरकार पाच वर्षे चाललं असतं
मुंबई : २०१९ चा पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावरून आता राजकीय वर्तुळाच चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून ज्याप्रकारची वक्तव्य येत आहेत. त्यावरून वाटतं की देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहेत. आधीच आठ आश्चर्य या जगात आहेत. आणखी दोन आश्चर्य दिल्लीत आहेत आणि एक आश्चर्य महाराष्ट्रात आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी आधी त्यांची जुनी वक्तव्य काढून बघावी. ते स्वत: अमित शाहांसमोर काय बोलले होते? त्यामुळे स्वत: च विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काहीही अर्थ नाही. जर या शपथविधीला शरद पवारांची मान्यता असती, तर ते सरकार पाच वर्षे चाललं असतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.