‘बाळासाहेब, माँसाहेबांना नकली म्हणता, तुम्हीच औरंगजेबाची संतान’; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे, असं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, मी कुणालाही औरंगजेब म्हणालो नाही. मी औरंगजेबी विकृतीवर बोललो होतो. तसेच जे महाराष्ट्रावर चाल करून येतील, त्यांना गाडू. हे कुणाला व्यक्तिगत बोललेलो नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर चाल करण्याचा प्रयत्न केला, त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलेले आहे, हा इतिहास आहे. इतिहासात अफजल खान, शाहिस्तेखान असेल किंवा औरंगजेब असेल. ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले, त्यांना इथे गाडले गेले. यात काही चुकीचे नाही. त्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – राज ठाकरेंची आज पुण्यात जाहीर सभा! वाहतुकीत मोठा बदल..
उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. या दोघांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना माननाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तेलंगणात जाऊन उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० सहकाऱ्यांना पूर्ण देश गद्दार म्हणून ओळखतो. कोण काय बोलले, हे मला माहीत नाही. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जे लोक एनडीएत गेले, लोक त्यांना गद्दार म्हणून हिणवत आहेत. ५० खोके, एकदम ओके, हे कुणाला म्हटले जाते? असंही संजय राऊत म्हणाले.