‘मला नाही तर त्यांना संरक्षणाची गरज..’; संदीप देशपांडेंनी सांगितला घटनाक्रम
हल्लेखोरांचे कोच देखील आम्हाला माहीत आहेत
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत काल घडलेला घटनाक्रम सांगितला आहे.
मी घाबरणार नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. पोलिस तपास करत आहेत. त्यांचा तपास पूर्ण व्हायला आहे. तेव्हा सर्व बाहेर येईल. हे सर्व कोणी केलं हे आम्हाला माहीत आहे. मी माझं सविस्तर म्हणणं FIR मध्ये सांगितलं आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.
हल्लेखोरांचे कोच देखील आम्हाला माहीत आहेत. पोलिसांचा तपास योग्य रीतीने सुरू आहे, तो पूर्ण होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही, तर या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी विचारपूस केली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस नेमले, परंतु मी कोणाला घाबरत नाही त्यामुळे मी वनम्रपणे सुरक्षा परत करतो असंही देशपांडे यांनी यावेळी सांगितलं आहे.
आम्ही कोरोना काळातील घोटाळा उघडकीस आणणार होतो. त्याआधीच माझ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. आता पोलिसांनी मला नाही तर त्यांना सुरक्षा द्यावी. मी कोणाला घाबरत नाही. मी दोन दिवसात नवा घोटाळा बाहेर काढणार होतो त्याचा सुगावा हल्लेखोरांना लागला असेल त्यामुळे त्यांनी माझ्यावर हल्ला केला असावा असंही देशपांडे म्हणाले.