रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्वसामान्यांवर कोसळणार महागाईचे संकट
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन १० दिवस उलटले आहेत. मात्र बलाढ्य रशियासमोर युक्रेनी सैन्य अजिबात गुडघे टेकण्यास तयार नाही. त्यामुळे रशियाला अद्यापही युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेता आलेली नाही. मात्र या युद्धामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांचा अन्न पुरवठा व जीवनमान या दोन्हींवरील संकट अधिक गडद झाले आहे, असे एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. या युद्धात लाखो युक्रेनियन शेतकऱ्यांना पळून जावे लागल्याने संपूर्ण शेतीच्या शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच युद्ध परिस्थितीत येथील बंदरेही बंद आहेत. ही बंदरे अन्न पुरवठ्याची प्रमुख केंद्रे होती. जगभरात ब्रेड नूडल्स आणि पशुखाद्य बनवण्यासाठी गहू आणि इतर खाद्यपदार्थांचा पुरवठा ही बंदरे करत होती.
महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेचे संचालक अरनॉड पेटिट यांनी ‘हे युद्ध जास्त काळ चालले तर युक्रेनमधून स्वस्त गव्हाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना जुलैमध्ये अन्नधान्य टंचाईचा सामना करावा लागू शकतो. या संकटामुळे निर्माण झालेली अन्न असुरक्षितता इजिप्त आणि लेबनॉनसारख्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांना दारिद्र्यात आणू शकते’, अशी शक्यता वर्तविली आहे.
तसेच युक्रेनच्या संकटाचा परिणाम भारताच्या आर्थिक विकासावर होईल आणि सर्वसामान्यांच्या खिशावर याचा बोजा वाढेल, अशी भीती प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जयंत आर वर्मा यांनी व्यक्त केली आहे