‘RSS ला घटनेच्या कक्षेत आणण्याबाबतचा मसुदा आंबेडकरांनी सादर करावा
नांदेड – प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने काँग्रेस- राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या महाआघाडीमध्ये सामील व्हावे ही आमची इच्छा आहे. यासंदर्भात आंबेडकर यांच्याशी चर्चाही सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विविध जाहीर सभांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याबाबत आपल्याला काँग्रेसकडून लेखी हवे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आंबेडकर यांना पत्र लिहून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याबाबत लिखीत मसुदा घेऊन यावा आम्ही त्यावर सह्या करू असे लेखी पत्र दिले आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, भाजप आणि आरएसएस विरोधातील काँग्रेसची लढाई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आरएसएस विरोधात न्यायालयीन लढाईही लढत आहेत. 2014 च्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाचा भाजपला फायदा झाला. धर्मनिपरपेक्ष मतांचे विभाजन होऊन पुन्हा धर्मांध शक्तींचा फायदा होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीसह सर्व समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे ही काँग्रेस पक्षाची भावना आहे, असे चव्हाण म्हणाले.