कोस्टल रोड प्रकल्पात 1 हजार कोटींचा घोटाळा, आ. आशिष शेलारांचा आरोप
मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकीय आखाडेही आता आरोप प्रत्यारोपांनी रंगू लागले आहेत. आज भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेत कोस्टल रोडच्या नावाने एक हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. हा सत्ताधारी शिवसेनेच्या छत्रछायेखाली नाही तर भागीदारीमध्ये होत आहे, असा घणाघातही यावेळी शेलार यांनी केला. तसेच या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे कोस्टल रोडवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन भाजपा सरकारने जे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले त्यातील अत्यंत महत्त्वाच्या कोस्टलरोड प्रकल्पाला आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची किड लागल्याचे आता उघड होत आहे. यामुळे मुंबईकरांना मेट्रोप्रमाणे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे हे दुर्दैवी. या प्रकल्पात अंदाजे 1 हजार कोटी व अधिकचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. कोस्टल रोडच्या टप्पा एक मधील भरावासाठी लागणारा दगड आणि साहित्य हे शासनाच्या परवानाधारक खाणीतून न उचलता ते अन्य ठिकाणाहून उचलण्यात आल्याने सदर कंत्राटदार कंपनीने महाराष्ट्र सरकारला रॉयल्टीतून मिळणार्या रुपये 437 कोटींची अफरातफर केली आहे. यामागे कुणाचा वरदहस्त आहे? असा सवालही शेलार यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, भरावासाठी टेंडरमध्ये नमुद केलेल्या अटींपेक्षा उच्च घनतेच्या व कमी दर्जाच्या भराव साहित्याचा वापर करुन महापालिकेकडून अतिरिक्त रुपये 48.41 कोटी वसूल करण्यात आले आहेत.
महापालिकेचे हे नुकसान का करण्यात आले? तसेच कोस्टल रोड कंत्राटदारांने भराव सामग्रीची वाहतूक करताना बेकायदेशीर व ओव्हरलोड वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस वाहतूक विभागाने आकारलेला दंड सुमारे 81.22 कोटी रुपये का भरण्यात आला नाही? हा दंड माफ करुन यामध्ये कोणी कट कमिशन घेण्यासाठी काही षडयंत्र रचले आहे का? 35 हजार बोगस फेर्या दाखवण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे. हे खरे आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर कंत्राटदारांनी पुरवलेल्या निकृष्ट दर्जाचे साहित्य वादळांमध्ये वाहून गेले ते नुकसान महापालिकेकडून वसूल करण्यात आले का? साहित्यामुळे महापालिकेचे 17.86 कोटी नुकसान का करण्यात आले? हा भुर्दंड पालिकेला का? ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात केवळ टप्पा 1 मधील विविध कामात महाराष्ट्र सरकार आणि पालिकेची रुपये 684 कोटींची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वात चिंताजनक म्हणजे डिसेंबर 2020 नंतर आजपर्यंत एकट्या पॅकेज 1 मध्ये अतिरिक्त 23 लाख टन पुनर्प्राप्ती भरण्याचे साहित्य वापरले गेले आहे आणि वरीलपैकी बहुतेक बेकायदेशीर गोष्टी अजूनही केल्या जात असल्याचा आरोप आहे. असे असल्यास पॅकेज 1 मधील फसवणूकीची रक्कम रुपये 684 कोटीहून अधिक असून एकूणच प्रकल्पामधील बेकायदेशीरपणामुळे ही रक्कम रुपये एक हजार कोटींपेक्षा जास्त असेल. हा सर्व घोटाळा पाहता या प्रकल्पाच्या तीनही टप्प्यात अशाच प्रकारे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये त्यांना कोणाचा राजकीय पाठींबा आहे का? कुणाच्या आशिर्वादाने हा सर्व प्रकार सुरु आहे? शासनाचा महसूल बुडवून हा पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गाने कुठे वळवला गेला आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत असून या प्रश्नांची तातडीने एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शेलार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत याची तातडीने दखल घेतील असा विश्वासही शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.