काय ते एकदाचं बसून मिटवा! गंभीर-कोहली वादावर रवी शास्त्रींनी तिखट प्रतिक्रिया
मुंबई : आयपीएलच्या लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की दोन्ही खेळाडूंना शांत करण्यासाठी अनेकांना मध्यस्थी करावी लागत आहे. दरम्यान, यावर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी शास्त्री म्हणाले की, आता कोहली आणि गंभीरने हे प्रकरण इथेच संपवायला हवे. या गोष्टी एक-दोन दिवसांत पूर्ण होतील आणि मग त्यांना समजेल की आपण ही परिस्थिती थोडी चांगली समजून घ्यायला हवी होती. गौतम गंभीर याआधी ज्या राज्यातून खेळला होता, त्याच राज्यातून विराट देखील खेळतो.
गौतम गंभीरने दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत आणि विराट हा अनेकांचा आदर्श आहे. दोघेही दिल्लीचे आहेत. दोघांनाही एकाच ठिकाणी बसवून समजावून सांगावे की आता या गोष्टी टाळायला हव्यात. फक्त आत्ताच नाही तर कायमचे. मला वाटते की बीसीसीआयने असा नियम बनवला पाहिजे की ज्या खेळाडूंमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद झाला असेल त्यांना एका ठिकाणी बोलावून तो तंटा सोडवायला हवा आणि त्याच वेळी असे पुन्हा होऊ नये अशी ताकीद देखील दोघांना द्यायला हवी, असं रवी शास्त्री म्हणाले.
लाईव्ह टेलिव्हिजनवर हे सर्व पाहणे कोणालाही आवडत नाही, विशेषत: भांडणानंतर प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि या दोन्ही खेळाडूंनी ती मर्यादा ओलांडली आहे जे काही झाले ते तुम्ही दोघांनी मिळून दुरूस्त करा आता भविष्यात ते खपवून घेतले जाणार नाही, असंही रवी शास्त्री म्हणाले.