जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या राणा दाम्पत्याची पुन्हा निराशा; कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई |
अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना कोर्टात पुन्हा एकदा धक्का बसला आहे. कारण राणा दाम्पत्याला मुंबई सेशन्स कोर्टातही तातडीचा दिलासा मिळालेला नाही. जामीन मिळवण्यासाठी राणा पती-पत्नीने मुंबई सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने या प्रकरणात राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे या अर्जावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानात हनुमान चालीसा पठण करण्याच्या घोषणेनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी राणा दाम्पत्याने न्यायदंडाधिकारी कोर्टात जामीन अर्ज केला. हा अर्ज प्रलंबित असताना आणि त्यावर २९ एप्रिलला सुनावणी असतानाही त्यांनी सेशन्स कोर्टातही जामीन अर्ज केला होता.
- नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात कोणता गुन्हा दाखल?
राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ खाली दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता. तसंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली बॉम्बे पोलीस कायद्याखालील कलमेही लावली. त्यानंतर पोलिसांनी राजद्रोहाचे १२४-अ हे कलमही वाढवले. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या.