‘..तर राजकारणातून संन्यास घेईन’; राजेश टोपेंचं सत्ताधाऱ्यांना आव्हान
मुंबई | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या प्रकरणांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार आणि राजेश टोपे यांची नावं घेत गंभीर आरोप केले. यावरून राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राजेश टोपे म्हणाले की, जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आग्रही असतात, आहेत आणि होते. त्यामुळे कोण सत्तेत आहे किंवा नाही हे महत्त्वाचं ठरत नाही. त्यामुळे आम्ही विरोधात आहोत म्हणून हे आंदोलन होत नाहीये. जरांगे पाटलांनी स्वत:ही अनेकदा सांगितलंय की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मराठा आरक्षणासाठी ते काम करतायत.
आंतरवली सराटीमध्ये माणुसकी म्हणून पाणी, चहापोहे वगैरे पुरवले. मनोज जरांगे पाटलांच्या संपर्कात आम्ही नाही. सरकारच त्यांच्याशी चर्चा करतंय. शिष्टमंडळासोबत स्थानिक आमदार म्हणून जाणं हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे आज व्यक्त करण्यात आलेला संशय, आरोप धादांत खोटे आहेत. त्यात कोणतंही सत्य नाही. या लढ्याला वेगळं वळण लागण्याचं काम होऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
हेही वाचा – ‘विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा लाठीचार्ज झाला, तेव्हा आपण तिथे गेलो होतो. लाठीचार्ज झाला तेव्हा मी तिथे गेलो. पण जखमींवर उपचार तातडीने व्हावेत हे पाहण्यासाठी गेलो होतो. तिथला लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे गेलो होतो. त्याशिवाय माझा तिथे जाण्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता. आता एसआयटीमधून सत्य समोर येईलच. खरंतर अशा प्रश्नावर एसआयटी नेमायला हवी का? हाही प्रश्न आहे. जर यात मी भावना भडकवण्याच्या प्रयत्नात एक टक्काही दोषी असेन, तरी महाराष्ट्राच्या जनतेनं काहीही शिक्षा दिली तरी भोगायला तयार राहीन. राजकारणातून संन्यास घेईन. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमचीही मागणी आहे. त्याच भावनेनं आमचं आंदोलनाला समर्थन आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.
प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?
‘शरद पवार मनोज जरांगेंना फोन करत होते. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. मनोज जरांगेंचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसनं लावले. शरद पवार जसं सांगतात, तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत’, असा आरोप संगीाता वानखेडेंनी केला आहे. राजेश टोपेंच्या कारखान्यावर या सगळ्या प्रकाराचं षडयंत्र रचलं गेलं’, असा दावाही संगीता वानखेडेंनी केला आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.