राज ठाकरेंच्या भूमिकापालटाची दिल्लीत गंभीरपणे दखल नाही? राजकीय वर्तुळात चर्चा
नवी दिल्ली | गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना लक्ष्य करणारे आणि आता भाजपच्या मुद्द्यांचे समर्थन करून मैदानात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकापालटाची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कोणीही गंभीरपणे दखल घेतलेली नाही.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजप कारस्थान करीत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. अशा स्थितीत मुंबईच्या जीवावर राजकारण करणारे राज ठाकरे यांना भाजपचे हे कारस्थानी डावपेच मान्य असतील काय, असा प्रश्न विरोधकांच्या गोटातून केला जात आहे. भाजपच्या नादी लागून राज ठाकरे आपली उरलीसुरली राजकीय विश्वासार्हताही गमावत असल्याचे मत विरोधक व्यक्त करीत आहेत.
मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसा आणि महाआरत्यांनी शह देण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेची सत्ताधारी भाजपमध्ये प्रशंसा होत असली, तरी विरोधी पक्षांच्या मते प्रत्येक निवडणुकीत भूमिका बदलणारे राज ठाकरे यांच्या राजकारणातील भूमिकासातत्य संपले आहे. ‘राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपले वेगळे अस्तित्व दाखविण्याची संधी होती; पण गेल्या दहा वर्षात ते काहीही विशेष करू शकले नाहीत.
४ तारखेपासून आम्ही ऐकणार नाही, दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार | राज ठाकरे
मशिदींवरील भोंग्यांबाबतची मूळ घोषणा भाजपची आहे. राज ठाकरे भाजपचाच मुद्दा उचलून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण त्याला मर्यादा आहेत. राज ठाकरे यांनी भाजपमध्ये सामील व्हावे आणि आपण तिथे किती काळ टिकतो हेही अजमावून घ्यावे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या वर्तुळात उमटली आहे.