‘लाठीचार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी करा’; राज ठाकरेंचं आंदोलकांना आवाहन
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान, या मराठा आंदोलनासाठी अनेक राजकीय नेते पुढे आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय नेते फक्त तुमची मत मागतात. सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतात. राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जातो. ते फक्त आरक्षण आणि पुतळ्याचं राजकारण करतात. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका.
हेही वाचा – भारतीय संघाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह आशिया कप सोडून मायदेशी परतला
सत्तेत नसतांना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जात आहे. फडणवीस म्हणतात, राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मला या नेत्यांप्रमाणे खोटे बोलता येणार नाही. मी मुख्यंमत्री यांची भेट घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.