‘प्रांतीय भेदभाव न ठेवता आपण एकमेकांसोबत बांधिलकी जपली पाहिजे’; राहुल महिवाल
मराठी भाषेची तुलना कोणत्याही इतर भाषेशी होवू शकत नाही
पिंपरी : शहरात आपण विविध प्रांताचे नागरिक एकत्र येवून राहत आहोत. आपण सर्व बांधव आहोत. या उक्तीप्रमाणे एकत्रित राहिल्यास “वसुधैव कुटुंबकम”चा प्रत्यय येईल. यामुळे समाज कंटकांचा कट हाणून पाडला जाईल. आणि देशाला कुठलीही हानी पोचणार नाही, असा विश्वास पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल यांनी व्यक्त केला.
निगडी येथील चिंचवड मल्याळी समाजम संचलित (सीएमएस) इंग्लिश मिडियम सेकंडरी हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेह संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सीएमएस इंग्लिश मिडियम हायस्कुलचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, माजी अध्यक्ष पी.व्ही भास्करन, उपाध्यक्ष पी श्रीनिवासन, खजिनदार पी. अजयकुमार, सांस्कृतिक समिती प्रमुख जी. करुणाकरन, महिला प्रमुख प्रविजा विनीत, उच्च माध्यमिकच्या मुख्याध्यापिका बिजी गोपकुमार, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी “स्वातंत्र्य पूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत” आजतागायत प्रगतीचा चढता आलेख हा नाट्य, नृत्य कला कृतीतून रसिकांसमोर मांडला.
राष्ट्रीयत्व यापेक्षा मोठा धर्म नाही. माता आणि मातृभूमी हि स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. आपण मानव आहोत यंत्रमानव नव्हे त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना एकमेकांबद्दल आत्मियता, जाणीव जागरूक ठेवली पाहिजेत. प्रांतीय भेदभाव न ठेवता आपण एकमेकांसोबत बांधिलकी जपली पाहिजेत. मुलांमध्ये देशप्रेम जागरूक करण्यासाठी देशातील विविध पैलूंची, भौगोलिक परिसराची माहिती देणे आवश्यक आहे. माझी हिंदी मातृभाषा आहे. महाराष्ट्रात आल्यावर लवकर मराठी भाषा शिकलो. आज मला मराठी बोलताना लिहिताना, खूप आनंद होतो. कारण मराठी भाषा हि मनाची व हृदयाची भाषा आहे. मराठी भाषेची तुलना कोणत्याही इतर भाषेशी होवू शकत नाही, असं राहुल महिवाल म्हणाले.
यावेळी, प्रास्ताविक भाषण अध्यक्ष टि.पी विजयन यांनी केले.मुख्याध्यापिका बीजी गोपकुमार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सूत्रसंचालन व आभार सोफिया मार्गरेट यांनी मानले.