जिल्ह्यात आज पुन्हा पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ जारी

अहिल्यानगर : हवामान विभागाने जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो ॲलर्ट) जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ऑरेंज ॲलर्ट जारी केला होता. अनेक भागात वादळी वारे वाहिले तसेच तुरळक स्वरूपात पाऊसही झाला.
मेघगर्जनेवेळी, विजा चमकताना किंवा वादळीवारे वाहतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकलपासून दूर राहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे व विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा रोहित्राजवळ थांबू नये. जाहिरात फलकाच्या (होर्डिंग्ज्) दुर्घटना टाळण्यासाठी दक्षता घ्यावी.
हेही वाचा – शरद पवारांचा उत्तराधिकारी ठरला? पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने वेधलं सर्वांचे लक्ष
विजा चमकताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा.
धरणाच्या पाण्यात वा नदीच्या प्रवाहात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच नियोजन करावे. वादळी वारे, वीज, पाऊस, गारपिटीपासून जनावरांच्या संरक्षणाची दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.