‘तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

पुणे : मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची आता उचलबांगडी होणार आहे. जास्त काळ एकाच मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा, असे निर्देश देत, आढावा घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले असून, आता तीन वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची कुंडली गोळा करण्यात येत आहे. या बैठकीला आमदार गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा – महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकला… ई साहित्याला राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार
यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठरावीक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एसटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. या मागणीला दुजोरा देत मंत्री सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.