त्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा?

पुणे : एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या गावांना असा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबरच संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास वेगाने होईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि इतर सुविधा सुधारणे यावर भर दिला जाईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच एमआयडीसीची आढावा घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये एकूण 63 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून, यातील 47 करार हे उद्योगाशी संबंधित आहेत. यातील कंपन्यांना जमीन वाटपाचे काम पूर्णत्वास जात आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादनाची अधिसूचना प्रकाशित करण्यात येत आहे. ई-निविदा पद्धतीने महाटेंडर्स पोर्टलवर 654 भूखंडांचे वाटप करण्यात आले असल्याचेही या वेळी बैठकीत सांगण्यात आले.
हेही वाचा – टूल हबसाठी तळेगावमध्ये 300 एकर जागा देणार
100 दिवस कृती आराखड्यात दिलेल्या कार्यक्रमात महामंडळाने 3500 एकर औद्योगिक भूखंड देण्याच्या उद्दिष्टांपैकी 2346 एकर औद्योगिक भूखंड उद्योगांना वाटप करण्यात आले आहे. जमीन अधिग्रहणाचे 110 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.