‘पुण्यात रावणराज होऊ देणार नाही’; पोलीस आयुक्तांची ग्वाही

पुणे : नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात नऊ हजार पोलीस तैनात आहेत. एकादी जादूची कांडी फिरवली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असे होत नाही. मात्र, आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही. त्यासाठी आपण आमचे कान आणि डोळे बना. सध्या, तुम्ही देखील जागृत होण्याची गरज आहे.
समाजात अपप्रवृत्ती दिसत असेल, समाजकंटक किंवा वाईट घटना घडत असतील तर तुम्ही तत्काळ पोलिसांना माहिती द्या. मी तुम्हाला आश्वासन देतो की, येथे रावणराज नाही, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणेकरांना दिली.शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांची सुरक्षितता या विषयावर शाळा सुरक्षा परिषद, आयोजीत करण्यात आली होती. यावेळी शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना अमितेश कुमार बोलत होते.
हेही वाचा – धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल, मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या
याप्रसंगी, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, मनोज पाटील, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी शाळांमध्ये जनजागृतीसह अनेक मुद्यांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. पोलिसांकडून भरोसा सेलमार्फत चालणार्या पोलीस काका आणि पोलीस दिदी, दामिनी मार्शल, बडी कॉप, जेष्ठ नागरिक,बाल सुरक्षा पथकामार्फत चालणार्या कामाची माहिती दिली. बालकांच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या कायद्यांची माहिती देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी याचे सादरीकरण केले.
शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, त्याची माहिती पंधरा दिवस संग्रहित राहिल याची दक्षता घ्यावी,सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज ठराविक अंतराने तपासणे आवश्यक असून अशा फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकांची आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल. शालेय वाहतूक करणार्या वाहनांच्या सुरक्षेबाबतही अमितेश कुमार यांनी प्राचार्यांना सूचना केल्या.





