‘माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न…..; अजित पवारांनी सांगितला लग्नाआधीचा ‘तो’ किस्सा

Ajit Pawar : छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त UPSC व MPSC मध्ये सारथी संस्थेमार्फत प्रायोजित यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. शाहू महाराज यांचं नाव जगातील सामाजिक समतेचे प्रतिक म्हणून घेतले जाते. देशात सामाजिक, आर्थिक विकास कसा साधायचा हा आदर्श शाहू महाराजांनी आपल्या पुढे घालून दिला असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना अजित पवार यांनी केले.
तसेच या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या लग्नाआधीचा एक किस्सा सांगितला. माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी? तेव्हा या निंबाळकर साहेबांनी मला मदत केली त्यांच्याकडे सिंमेटचे परवाने द्यायची जबाबदारी होती. मला 1000 पोती सिमेंट त्यांनी दिलं. त्यामुळे माझं घर बांधून झालं मग मी लग्न केलं ही सर्वसाधारण ८० च्या दशकातील गोष्ट असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार हे त्यांच्या कामाला सकाळी लवकर सुरुवात करत असतात. आज रविवारी असल्याने सारथीने अजित पवार यांना रविवारीची वेळ द्या असे म्हटले त्यानुसार त्यांनी वेळ दिली. अजित पवार म्हणाले मला सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यायला आवडतं. पण माझ्यामुळे अनेकांची गैरसोय होते. त्याबद्दल क्षमा मागतो.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिकेची शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम
नुकत्याच राज्यातील विविध शासकीय पोलीस अधिकाऱ्यांच्या व इतरही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यावर देखील अजित पवार यांनी भाष्य करत सगळी लोक लांब गावातून तुमच्याकडे येतात. कुणालाही काम न करता माघारी पाठवू नका, असा सल्ला नव्या अधिकाऱ्यांना यावेळी बोलताना अजित पवारांनी दिला.
सगळे म्हणतात की, दादा तुमची नजर बारीक आहे. पण, बारीक नजर असल्याचा फायदा होतो. सारथीची एवढी सुंदर इमारत माझ्या त्या बारीक नजरेमुळेच झाली आहे, असे मिश्किल विधानही अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले.





