राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल; प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत मंजुरीचे पत्र

पुणे : पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-2 मध्ये राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 22) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या होणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत माहिती देताना मंत्री गोरे म्हणाले, राज्यात सन 2024-25 या वर्षात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 20 लाख घरकुल मंजुरीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. 20 लाख घरे बांधकामासाठी ग्रामविकास विभागाला 100 दिवसांचा विशेष कृती कार्यक्रम आखून दिला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 20 लाख घरकुलांचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी घरकुल मंजुरी तसेच प्रथम हप्ता वितरणासाठी जागा उपलब्धता, लाभार्थ्यांचे बँक खाते उघडणे या अनुषंगीक बाबींसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा – पश्चिम घाटात सापडल्या ड्रॅगनफ्लायच्या दोन नवीन प्रजाती
राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत मागील सात वर्षांत 13,57,564 उद्दिष्टे होते. त्या तुलनेत सन 2024-25 या एका वर्षामध्ये टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्र राज्याला 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध नसेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत 500 चौरस फुट जागेसाठी प्रति लाभार्थी एक लाख रुपये जागा खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. 20 लाख घरकुल मंजुरीचे आदेश 28,000 ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी वाटप करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत.