देवेंद्र फडणवीसांना ‘या’ विषयावर पुस्तक लिहायला लावणार; पुण्यात अजितदादांची फटकेबाजी

पुणे : २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस यांनी ‘मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, दोन पक्ष फोडूनच आलो’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ हे पुस्तक मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहायला लावणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘ऐकलत का?’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी काही जुने किस्से सांगितले. त्यात त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ या फडणवीसांच्या घोषणेचाही उल्लेख केला.
हेही वाचा – देशातील हवामानात मोठा बदल; ‘या’ राज्यांना दिला अतिवृष्टीसह वादळाचा इशारा
अजित पवार यांनी एक जुना किस्सा सांगितला. ‘मी भाषण करायला उठलो. पण घाम फुटला होता. पण मी म्हटले साहेब एवढे बोलतात आपण बोलू. काय व्हायच ते होऊ दे, नंतर तुम्ही आजपर्यंत मला पाहत आहात. भाषण टाळ्यांसाठी नको. तर ते मनाचा ठाव घेणारे हवे,’ असे अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलताना कवी, लेखक रामदास फुटाणे म्हणाले की, पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे. हे दोन्ही कुटुंब एकत्र यावीत, ही महाराष्ट्राची इच्छा आहे. दादा खूप काम करतात, दादा अशीच वेळ साहित्य संमेलनालादेखील द्यावी. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातदेखील येत जावे. राजकारण तर काय रोजचे आहे, अशी साद कवी रामदास फुटाणे यांनी त्यांच्या भाषणातून दादांना घातली.या कार्यक्रमाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवारही उपस्थित होते.