TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पर्यटन महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि विविध निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून घरातच कोंडल्या गेलेल्या पर्यटकांनी यंदा दिवाळी सुटीनिमित्त भटकंतीला पसंती दिली आहे. यंदाच्या दिवाळी सुटीनिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागातील निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित झाली आहेत. शनिवार-रविवारला लागून दिवाळी आल्याने यंदा पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यास पसंती दिली आहे.       

गेल्या दोन वर्षांमध्ये दिवाळीमध्येही करोना संसर्गामुळे राज्य सरकारकडून विविध निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी पर्यटकांना इच्छा असूनही भटकंती करता आली नव्हती. यंदा करोना संसर्ग कमी असल्याने दिवाळी सुटीनिमित्त पुणेकरांनी बाहेरगावी जाण्यास पसंती दिली असल्याचे महामंडळाच्या निवासस्थांमधील आरक्षणावरून स्पष्ट झाले आहे.

याबाबत बोलताना पर्यटन महामंडळ पुणे विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे म्हणाल्या, ‘करोना निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून पर्यटक बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुटीनंतर दिवाळी सुटय़ांमध्येही पर्यटकांनी भटकंतीला पसंती दिली आहे. पुणे विभागातील कार्ले, भाजे, तारकर्ली, हरिहरेश्वर, दापोली, महाबळेश्वर, पानशेत, भीमाशंकर, माळशेज, नाणेघाट अशा विविध ठिकाणांना पर्यटकांची नेहमीच पसंती असते. त्यामुळे पुणे विभागातील महामंडळाची निवासस्थाने ८५ टक्के आरक्षित झाली आहेत. यंदाच्या दिवाळीत पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’

दरम्यान, महामंडळाच्या पुणे विभागात महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर, सिंहगड, अक्कलकोट आणि कोयनानगर अशी नऊ निवासस्थाने आहेत. त्यापैकी काही कारणांनी सिंहगड आणि अक्कलकोट ही निवासस्थाने सुरू नाहीत. उर्वरित सातही निवासस्थानी पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणात आरक्षण केले आहे.

डेक्कन ओडिसी रेल्वे सुरू

देशातील प्रसिद्ध शाही रेल्वेपैकी एक असलेल्या डेक्कन ओडिसी ही रेल्वेही आता सुरू झाली आहे. करोना निर्बंधांमुळे ही रेल्वे बंद करण्यात आली होती. ही रेल्वे आता सुरू करण्यात आली आहे, असे कोसे यांनी सांगितले. भारतात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हा पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटनास उत्तम काळ मानला जातो. भारतीय रेल्वे आणि पर्यटन महामंडळ यांच्यातील करारानुसार ही रेल्वे राज्यात आठ दिवस आणि सात रात्र प्रवास करते. यामध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अजंठा, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग असा प्रवास करते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button