रेशन वरील अन्न धान्य वितरण भ्रष्टाचाराची चौकशी करा
लोक जनशक्ती पार्टीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
पुणे । प्रतिनिधी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि रेशन दुकानदारांची निपःक्षपाती चौकशी पोलीस यंत्रणेकडून करावी, अशी मागणी.आज लोकजनशक्ती पार्टीने केली. या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.ही चौकशी आणि कारवाई झाली नाही तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी विभागीय आयुक्त कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर -जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी हे निवेदन सादर दिले. या वेळी प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, संजय चव्हाण, के. सी. पवार, संजय पाटील, आप्पा पाटील, एड. अमित दरेकर, माधव यादव आदी या वेळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले की, पुरवठा विभागाची चौकशी एका परिमंडळाने दुसऱ्या परिमंडळामार्फत करणे हा प्रशासकीय विनोद आहे. पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी व्हायला हवी. लोक जनशक्ती पार्टीने अन्नधान्य वितरणातील भ्रष्टाचाराची मागणी लावून धरल्यावर दिवाळीपूर्वी पुण्यातील ११ परिमंडळांमध्ये ११ पथके स्थापन करण्याचा आदेश सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी सुनंदा भोसले -पाटील यांनी काढला होता. अन्नधान्य न मिळालेल्या शिधा पत्रिका धारकांच्या परिमंडळ निहाय आलेल्या तक्रारींची चौकशी ही पथके करणार आहेत. रास्त धान्य दुकानांमध्ये अनियमितता आढळल्यास पंचनामे केले जाणार आहेत. शासकीय कर्मचारी अथवा दुकानदार दोषी आढळल्यास कारवाई करून २ आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा ,असे या आदेशात म्हटले आहे.
मात्र, प्रत्यक्षात चौकशी वेगळ्या गोष्टींची होत असून पुरवठा विभागच ती करीत असल्याचे लोक जनशक्ती पार्टीला आढळले. त्यामुळे याची निपःक्षपाती चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली.





