पुण्याचे नाव जिजापूर करा – संभाजी ब्रिगेड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/1-2.jpg)
पुणे – पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा आहे. कारण पुणे राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेले आहे. त्यामुळे पुणे शहराचे नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावे. त्याबाबत राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, चंद्रशेखर घाडगे, प्रकाश धिंडले यांनी केली आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने यासंदर्भात जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, विजापूरच्या आदिलशहाने 1630 मध्ये शहराची लूट केली होती. मोरार जगदेव यांनी पुण्याला उद्ध्वस्त करून लोखंडी पहार रोवून बेचिराख केले होते. तत्कालीन सांस्कृतिक दहशतवाद मिटवण्याचे काम महाराजांनी केले होते.
जिजाऊ माता आणि महाराज यांच्यासह पुण्यात एकत्र येऊन, सोन्याच्या नांगराने पुणे बसवले. हे एका महिलेचे कर्तृत्वच आहे. हा इतिहास सोनेरी इतिहासाचे महत्त्वाचे पान आहे. कर्तृत्ववान महिलांच्या शौर्याचा इतिहास समाजासमोर यावा, हा संभाजी ब्रिगेडचा नेहमी प्रयत्न असतो. म्हणून राज्य सरकारने पुण्याचे नाव बदलुन जिजापुर करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे. केंद्रात आणि राज्यात हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन सत्तेत आलेले आहे. आता छत्रपतींच्या आशिर्वादाची जाण ठेवून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिवप्रेमींच्या भावनांचा आणि छत्रपतींचा आदर करीत पुण्याचे नाव बदलून तात्काळ जिजापुर असे करावे, अशी मागणीही धुमाळ यांनी यावेळी केली.