आपल्या देशात असं कधी नव्हतं, दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत – भालचंद्र नेमाडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/5-13.jpg)
पुणे |महाईन्यूज|
देशात नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं आहे, आपली वाटचाल हिंसक पद्धतीने चालली असून आपण पाकिस्तान होत चाललो आहोत, अशी भूमिका ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली आहे.
नेमाडे पुढे म्हणाले की, “हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.”
नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग आहे. राजकारणी लोकांचा हा विषय नाही. आपल्या देशात गुप्तहेर, दहशतवादी, त्या देशातून हाकलून दिलेले गरिब-अनाथ आणि हा देश आवडतो म्हणून येणारे असे 100 प्रकारचे लोक येतात. त्या सर्वांना एकाच मापाने मोजणं बरोबर नाही. ज्यांना यायचं त्यांना येऊ द्यावं. सरकारची इतकी मोठी यंत्रणा आहे. त्यावर इतका खर्च होतो. त्यामुळे त्यातील दहशतवादी कोण आहेत हे शोधणं सरकारचं काम आहे. मात्र, कोणत्याही गरिब नागरिकाला या देशाचं नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नाही, असंही भालचंद्र नेमाडे यांनी नमूद केलं.