पुणे: पर्यावरण वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती होईल : प्रवीण दराडे
आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी’
पुणे: आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा एक उत्कृष्ट उपक्रम असून याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी चांगली जनजागृती होईल, असे प्रतिपादन पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायीवारीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, संचालक आदित्य शिरोडकर, नितीन गोरे, माजी न्यायमूर्ती ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी, एमआयटी पुणेच्या कार्यकारी संचालक स्वाती चाटे- कराड, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, म. प्र. नि. मंडळ पुणेचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.
दराडे म्हणाले, बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे काही ठिकाणी दुष्काळ, काही ठिकाणी पूर अशा आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे समाजात पर्यावरणाविषयी जागरुकता आणणे गरजेचे आहे. राज्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांमध्ये बहुतांश वारकरी शेतकरी असतात. वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्नआहे. पर्यावरणाचे महत्व त्यांच्यापर्यंत पोहोचून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी राहील आणि पर्यावरण संरक्षणाच्या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येकाने पर्यावरण पूरक जीवनशैली राबविणे आवश्यक आहे. सण, उत्सव पर्यावरण पूरक साजरे करावेत. मुंबई महापालिकेने यावर्षी गणेश उत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका यांनीही अशा प्रकारचे उपक्रम हाती घेवून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याचा प्रयत्न करावा. एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून खरेदीला जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही दराडे यांनी केले.
कार्यक्रमात ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळ, चंदाबाई तिवाडी आणि शाहीर देवानंद माळी यांनी कीर्तन, लोककला पथक आणि पोवाडा यांच्या माध्यमातून समृद्ध पर्यावरण व व्यसनमुक्तीवर आधारीत सादरीकरण केले.
प्रास्ताविकात डॉ. खांडगे यांनी ‘पर्यावरणाची वाटी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ह.भ.प. डॉ. गोसावी आणि गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.