राज्यात पसंतीचा वाहन क्रमांक महाग
मुंबई : नवीन वाहनांच्या ‘व्हीआयपी’ म्हणजेच पसंती क्रमांकासाठी आता जादा शुल्क मोजावे लागणार आहे. परिवहन विभागाने या क्रमांकासाठी शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव केला असून मसुदा अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ‘०००१’ या क्रमांकासाठी चारचाकी वाहनधारकांना तीन लाख रुपयांऐवजी पाच लाख रुपये शुल्क द्यावे लागेल. तर दुचाकी, तीन चाकी आणि परिवहन वाहनांसाठी एक लाख रुपये शुल्क आकारण्याचे अधिसूचनेत आहे. सध्या ५० हजार रुपये शुल्क आहे.
मसुदा अधिसूचनेला शासनाची मंजुरी आवश्यक असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. या प्रस्तावित शुल्क रचनेबाबत नागरिकांना १४ ऑक्टोबपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ‘०००१’ क्रमांकासाठी सहा लाख रुपये द्यावे लागणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये सध्या चार लाख रुपये या क्रमांकासाठी आकारले जातात. याशिवाय वाहन क्रमांक ०००९, क्रमांक ००९९, क्रमांक ०७८६, क्रमांक ०९९९ तसेच ९९९९ हे वाहन क्रमांक घेण्यासाठी चारचाकी वाहनधारकांना अडीच लाख रुपये आणि दुचाकी, तीनचाकी आणि अन्य परिवहन वाहनासाठी ५० हजार रुपये शुल्क केले आहे. यासह अन्य पसंतीचे वाहन क्रमांकाच्या शुल्कातही वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात प्रत्येक नोंदणी मालिकेत २४० भिन्न क्रमांक व्हीआयपी क्रमांक म्हणून ओळखले जातात. या क्रमांकांच्या शुल्कात २२ मे २०१२ पासून बदल करण्यात आले होते.