जंगल में फायर नही, फ्लॉवर होने चाहिये; वनविभागाच्या मदतीला ‘पुष्पा’ आला धावून
मुंबई |
उन्हाचा तडाखा सध्या राज्यभरात वाढला आहे. विदर्भात तर त्याची तीव्रता आणखी जास्त आहे. सध्या विदर्भात पारा ४१ अंशांवर गेला आहे. त्यामुळे जंगलात वणवे लागण्याची भीती आहे. अशातच काही खोडसाळ पर्यटकांमुळे नियमांची पायमल्ली होत आहे. अशा पर्यटकांना धडा शिकविण्यासाठी वनविभाग आणि ग्राम विकास समितीने भन्नाट शक्कल लढविली आहे. यात सिनेसृष्टीतील कलावंताचे फलक तयार करून जनजागृती करण्यात येत आहे. यासह चालत्या गाडीतून सिगारेट फेकल्यास ५ हजाराचा दंड आणि ६ महिन्याची कैद अशी कारवाई होणार असल्याचे फलक लावण्यात आले आहे.
यासह ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉगच्या माध्यमातून जनजागृती केली जाते आहे. तसंच वणव्याची माहिती देण्यासाठी वनविभागाने १९२६ क्रमांकाचा टोल फ्री क्रमांक देखील सुरू केला आहे. याबद्दल बोलताना सीमाडोह इथल्या वनरक्षक प्रीती लांजेवार म्हणाल्या की, सध्या वाढत्या तापमानामुळे जंगलात वणवा लागण्याची शक्यता असते. तसंच काही पर्यटक सिगारेट ओढून रस्त्यातच त्याचं पेटतं थोटूक टाकतात, त्यामुळे आग लागण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच आम्ही या पद्धतीने जनजागृती करण्याचा पर्याय अवलंबला आहे.