“वृक्षारोपणाद्वारे प्रत्येकाने ‘ऑक्सीजन बॅंक’ तयार करावी”; प्रकाश जावडेकर
देवराई, वृक्ष पूजन सारख्या संकल्पना फक्त भारतात आहे
पुणे : ‘तेर पॉलिसी सेंटर’ संस्थेने टाटा मोटर्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘तेर ऑलिंपियाड २०२२-२३’ या पर्यावरणविषयक प्रश्नमंजुषा अखिल भारतीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते थाटात पार पडला. स्पर्धेचे हे ८ वे वर्ष होते.
तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांनी प्रास्ताविक केले. तेर पॉलिसी सेंटर आयोजित ऑलिंपियाड पर्यावरणविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून दोन लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. संस्थेने ७ लाखांहून अधिक वृक्ष दुर्गम, डोंगराळ भागात लावले आहेत. जवळ पास १२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तेर ऑलिम्पियाडच्या मोहिमेत सहभागी करून घेतलं आहे.
भूस्खलन, पूर, सततचा पाऊस हे चिंतेचे विषय आहेत. हे सर्व जागतिक तापमानवाढीचे हे दुष्परिणाम आहेत. ओझोन स्तर कमी होत आहे. जमिनीचे, पर्यावरणाचे आपले एक नाते आहे, एक संतुलन आहे, ते बिघडू देता कामा नये. आपली स्वतःची ऑक्सीजन बँक आपण तयार केली पाहिजे. त्यासाठी त्यासाठी प्रत्येकाने किमान ७ वृक्ष लावले पाहिजेत. ते जगवले देखील पाहिजेत. ‘स्कुल नर्सरी प्रोग्राम’ सारखे उपक्रम राबवले पाहिजे. कोळशाचा उपयोग कमी केला पाहिजे. सौर उर्जा वापरली पाहिजे, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
भारतीय संस्कृती सुरुवातीपासून पर्यावरणस्नेही आहे. देवराई, वृक्ष पूजन सारख्या संकल्पना फक्त भारतात आहेत. विकसित देशांच्या तुलनेत भारतातून प्रदूषण प्रमाण फारसे नाही.विकसित देशांनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हरित उर्जा संकल्पना मोठया प्रमाणात राबवली जात आहे. जंगले वाढत आहेत. कोची सारखे विमानतळ सौर उर्जेवर चालत आहे. हायड्रोजन वर लवकरच गाडया चालतील.
तेर पॉलिसी सेंटरद्वारे होत असलेल्या पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न महत्वपूर्ण आहेत.विद्यार्थी वर्गात पर्यावरण प्रेम जागृत करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेसारखा उपक्रम ८ वर्ष सातत्यपूर्वक चालवला जात आहे, ही उल्लेखनीय बाब आहे, असेही प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, टाटा मोटर्सचे रोहित सरोज, महेश गावसकर, मयुरेश कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त अजय फाटक व्यासपीठावर उपस्थित होते. सोबतच, प्रदीपकुमार साहू, प्रमोद काकडे, डॉ. शंकरभट कुलसत्यम यांचा पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.