‘ही केस आपल्याला संपवायची आहे’; शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे मोठे विधान

मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडलेल्या शिवसेना पक्ष चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. मात्र, तारीख पे तारीख सिलसिला सुरु राहिला. आता न्यायालयाने ऑगस्टमध्ये यावर सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. पण न्यायालयाने केलेल्या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयामाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही मागणी केली आहे.
याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांनी 2 जुलैला खंडपीठासमोर केली होती. त्यावर आज न्यायालयात युक्तीवाद होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायाधीश सूर्यकांत यांनी ऑगस्ट महिन्यांत हे प्रकरणावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्याप त्यांनी तारीख निश्चित केलेली नाही. आजच्या सुनावणीदरम्यान सूर्यकांत यांनी ही केस आपल्याला संपवायची आहे, असे विधान केले आहे.
हेही वाचा – निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीदरम्यान, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ. अशा स्पष्ट शब्दात ठाकरे गटाला सूचना दिल्या.
यावेळी शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यु्क्तिवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणूक येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु, निवडणूक संपल्यानंतर म्हणजे २०२५ हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.





