“महाराष्ट्राच्या हिताचे असेल तसे वागायला आम्ही तयार”; आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

Aditya Thackeray : एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान, मनसेचे राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
‘कोण कुणाला भेटतंय, काय बोलतंय, ते माहित नाही. परंतु, आमचे मत स्पष्ट आहे की, मराठी माणसाच्या मनात असेल तेच होईल. मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या हिताचे असेल तसे वागायला आम्ही तयार आहोत,’ असेही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; कोकणात रेड अलर्ट जारी…
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘युती किंवा आघाडी होईल की नाही यापेक्षा आमची पहिली आघाडी ही राज्याच्या जनतेशी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही जनतेसोबत आहोत’ असेही त्यांनी नमूद केले. Aditya Thackeray |
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “पुण्यात जे कॉंक्रीटीकरण चालू आहे. विशेषतः मुळा- मुठा नदी सुधार योजनेला आम्ही सातत्याने विरोध केला आहे. ही नदी सुधार योजना नसून, नदीचा नाश केला जात आहे. पुण्यातील मुठा नदीला अरुंद करून, खोली कमी करण्याचे हे जगातील पहिले उदाहरण आहे. नद्या, त्यांचे प्रवाह व वाढती लोकसंख्या पाहता कॉंक्रीटीकरणाचा मारा शहरात कमी करायला हवा. जनतेचा विचार करून, विकास झाला पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही,” असे म्हणत त्यांनी पुण्यातील समस्यांबाबतही भाष्य केले.