‘नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार’; काँग्रेस नेत्याचं विधान
![Vijay Vadettiwar said that the new husband is ready to sit on the throne of Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar-1-780x470.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणीसाठी गेलं आहे. १६ आमदार अपात्रप्रकरणी राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा केला जात आहे. यावरून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असं बच्चू कडूही म्हणाले आहेत. याबाबत विजय वडेट्टीवारांना विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले, बच्चू कडू काय म्हणतात ते पुढच्या काळात ठरेल. ते चांगेल मंत्री होते. परंतु तिकडे (शिंदे गटात) गेले. त्यामुळे तेही (मंत्रीपद)गेलं अन् हेही गेलं. त्यांची महाविकास आघाडीत येण्याची तयारी असेल आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करू आणि हायकमांडच्याही कानावर टाकू. बच्चू कडूंची तयारी असेल तर चर्चा करायला तयार आहेत. त्यांच्या पक्षाचं भलं कुठे आहे ते त्यांना कळलं असे.
हेही वाचा – हनुमानगढीचे महंत राजूदास महाराज उद्धव ठाकरेंवर भडकले; म्हणाले..
पुढच्या दहा तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे, अशी आमची माहिती आहे. ते आता नवरदेव कोण आहेत, हे १० तारखेच्या निकालानंतर कळेल. त्यामुळे बच्चू कडूंना अंदाज आला असेल की आता मंडपही बदलतोय आणि नवरदेवही बदलतोय. त्यामुळे काही खरं नाही. मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून अनेकजण तयार आहेत. पण मला वाटतं की नवीन नवरदेव तयार आहेत, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.