‘आमच्यातील अंतरपाट अनाजी पंताने दूर केला’; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray | महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश (जीआर) रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि मराठी अस्मितेचा विजय साजरा करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने आज मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे भव्य विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, की राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी.
हेही वाचा : “बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवलं”; राज ठाकरेंचं वक्तव्य
मला कल्पना आहे की आज अनेक बुवा, महाराज व्यस्त आहेत. कोणी लिंबू कापतोय, कोणी टाचण्या मारतोय, कोणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत असेल. कोणी रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो. या सगळ्या बोंदूपणाविरोधात माझ्या आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) लढा दिला आहे आणि त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतानी दूर केला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.