‘राहुल गांधींचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही’; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Ramdas Athawale : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तम भविष्य आहे. पण, विरोधी पक्षनेते म्हणून. पंतप्रधान बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.
ग्वाल्हेरमध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना आठवले यांनी नेहमीच्या मिश्कील शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली. राहुल आणि कॉंग्रेसला उद्देशून त्यांनी शाब्दिक चिमटे काढले. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठामपणे साथ आहे.
हेही वाचा – ‘केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मी मोदींसमवेत असेपर्यंत राहुल यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भाजपची विजयी घोडदौड कायम असल्याचे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले. ते पाहता भविष्यात कॉंग्रेसला स्वबळावर संसदेत बहुमत मिळवणे अवघड जाईल, असा दावाही त्यांनी केला.
वर्षभरात मोदी सरकार कोसळेल, असा दावा नुकताच राहुल यांनी केला. त्यावरून त्यांच्यावर भाजपने टीकेची झोड उठवली. त्यामुळे राजकारण तापल्याचे पाहावयास मिळत आहे. अशात आठवले यांनी केलेल्या टिप्पण्या राजकीय चर्चांना आणखी तडका देणाऱ्या ठरल्या आहेत.





