शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचे मराठा आरक्षणावर भाष्य
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली
![Shirur, MP, Amol Kolhe, Maratha, Reservation, Commentary, Manoj Jarange Patil, Demand, Reaction,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/amol-kolhe-780x470.jpg)
शिरूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्या आधारे ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या. सग्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. तर सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसी संघटनांचा विरोध आहे. यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाकडून आंदोलन, उपोषण केलं जात आहे. या सगळ्यावर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. तसंच मनोज जरांगे यांच्या मागणीवरही प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
कुणबी आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे. पण समाज सगळ्याच घटकापासून बनला आहे. सगळ्यात समाज घटकांच्या अशा आकांक्षांचा विचार होणं, हे देखील तितकच महत्त्वाचं आहे. संसदेत जातीय जनगणना घेण्याची मागणी केली आहे. ती सर्वांची मागणी आहे. जातीय जनगणना झाली पाहीजे. जातीय जनगणना झाली तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी फायदा होईल असा सर्वांचं मत आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील माजी नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर मी देखील ऐकलं आहे. माझी अजून भेट झाली नाही, अडचणीच्या काळात ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्या सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षश्रेष्ठी हा सगळा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतील. अडचणीच्या वेळी जे लोक सोबत होते त्यांचे मत आणि मन दुर्लक्षित करून चालणार नाही. येणारे का येत आहेत? याचा विचार करून स्वागत करू, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
पुण्यात अमोल कोल्हे यांच्या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडतोय. ‘शिवनेरीचा छावा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे. पुस्तक प्रकाश सोहळ्यात अमोल कोल्हे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. याआधी अमोल कोल्हे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा संसदेत गेली 5 वर्ष जी भाषण केली, त्याचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तिकिटाबद्दल जो गोप्यस्फोट असेल तो या नाही तर पुढच्या पुस्तकात असेल, असं अमोल कोल्हे म्हणालेत.