‘मी शिंदे गटात उपनेते फक्त नावाला’; शरद पोंक्षेंचा मनसेच्या व्यासपीठावरून हल्लाबोल

Sharad Ponkshe | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यात प्रचारसभा पार पडली. या सभेत अभिनेते आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते शरद पोंक्षे यांनी भाषण करत महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी २०१९ पासून महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी मनसेच्या व्यासपीठावरून बोलताना मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला आहे, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.
शरद पोंक्षे म्हणाले, की एवढी वर्ष मी या विचारसरणीला धरून काम करत होतो. आता माझं मत परिवर्तन झालंय. मला माझी चूक लक्षात आली आहे, म्हणून मी या विचारसरणीला धरून पक्षात प्रवेश करतोय, असं कधी इडकून तिकडं उड्या मारणारे बोलतात का? कधीच बोलत नाहीत. सत्तेसाठी एक अख्खा पक्ष विरुद्ध विचारसरणीच्या पक्षाबरोबर येतो आणि एकत्र आल्यानंतरही तो पक्ष म्हणतो की आम्ही आमची विचारसरणी सोडलेली नाही, कमाल आहे. १३ कोटी राज्यातील जनतेला हे सर्व वेडं बनवत आहेत. पण ते आपल्याला वेडं का बनवतात? तर आपण वेडं व्हायला तयार असतो. पण आता तुम्ही ठरवा.
हेही वाचा – चिंचवडमधून नाना काटे यांची तलवार म्यान, महायुतीचे पारडे जड!
एक स्वत:ची विचारसरणी घेऊन महाराष्ट्राला लागलेल्या रोगापासून आणि आजारी पडलेल्या महाराष्ट्राची तब्येत ठणठणीत करण्यासाठी आता चांगले २८८ डॉक्टर या विधानसभेत पाठवा. मी जेव्हा आजारी पडतो, म्हणजे मी शरद पोंक्षे मी ब्राम्हण आहे म्हणून ब्राम्हण जातीचाच डॉक्टर पाहतो का? नाही. मी काय पाहतो तर चांगला डॉक्टर कोण आहे हे पाहून डॉक्टरकडे जातो. कारण मला चांगल्या प्रकारे बरं व्हायचं असतं. जेव्हा मला चांगलं व्हायचं असतं तेव्हा मी चांगल्या डॉक्टरकडे जातो. मग तेव्हा आपण जात पाहत नाही. मग आज गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र आजारी पडला आहे, असं शरद पोंक्षे म्हणाले.
मी गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. मी एक पुस्तक लिहिलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मला बोलावलं होतं. राजकारणी कसा असावा? याचं उत्तम उदाहरण आहे. मी कट्टर हिंदुत्वावादी आहे. मी सावरकर यांच्यावर व्याख्याने देतो. सर्व राज ठाकरेंनाही माहिती आहेत. तेव्हा त्यांच्या टेबलवर काही पुस्तक होती. तेव्हा त्या पुस्तकांवर त्यांनी काही पुस्तकांतील रेफरन्स मला वाचून दाखवले. हे देखील एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी. मला फार कौतुक वाटलं, असं शरद पोंक्षे म्हणाले.
मला अनेक राजकीय नेत्यांना भेटण्याचा योग योतो. तेव्हा मला काहींची कीव येते. कारण त्यांना शून्य माहिती असते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाले म्हणून मी एका सांस्कृतिक मंत्र्यांकडे गेलो. त्यावेळी मला तेथील कोणीतरी एका व्यक्तीने विचारलं की आता तुम्ही नथुराम नाटक करता की बंद झालं? मग मी सांगितलं की ते नाटक बंद केलं. तेव्हा मला त्या मंत्र्यांनी विचारलं की म्हणजे? तेव्हा मी त्यांना सांगितलं की ती भूमिका मी करत होतो. तेव्हा ते म्हणाले की अच्छा तुम्ही ती भूमिका साकारत होतात का? म्हणजे २५ वर्ष या क्षेत्रात काम करत असतानाही आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांना हे माहिती नव्हतं, असंही शरद पोंक्षे म्हणाले.





