मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | मराठी भाषा आणि संस्कृतीवर होत असलेल्या हल्ल्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मराठी कलाकार आणि साहित्यिकांच्या मौनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट नाना पाटेकर, प्रशांत दामले आणि माधुरी दीक्षित यांची नावे घेत, मराठीवर हल्ले होत असताना हे कलाकार गप्प का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे शत्रू असं म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की, देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वात आधी मराठी शाळांची जी दुरवस्था आहे त्याबाबत काम केलं पाहिजे. मराठी भाषेला कसं बळ कसं मिळेल आणि मराठी माणूस, मराठी मातीत सन्मानाने कसा जगू शकेल हे पाहिलं पाहिजे. तो अदाणी, लोढा यांचा गुलाम बनू नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हिंदी हा विषय महाराष्ट्रासाठी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी येतं. महाराष्ट्र आणि हिंदी यांचं वैर असतं तर हिंदी चित्रपट, साहित्य, शाळा या सगळ्याला इतकं प्राधान्य दिलं पाहिजे.
हेही वाचा : त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस आणि आपल्याला शिवसेना म्हणणारे डुप्लिकेट लोक यांनी नरेंद्र मोदींना विचारलं पाहिजे की हिंदी सक्ती गुजरातमध्ये का नाही? महाराष्ट्रातच का? हिंदी महाराष्ट्राला कुणीही शिकवण्याची गरज नाही. हिंदी गुजरातमध्ये शिकवा. नरेंद्र मोदी अमित शाह म्हणतात आम्ही गुजराती आहोत, हिंदी नाही. हिंदी है हम म्हणणारे आपण आहोत. हिंदीवर आपलं प्रेम आहे, आम्ही भाषेचा द्वेष करत नाही. पण आता मतांचं राजकारण चाललं आहे. त्यामुळे हा मुद्दा आणला गेला आहे. हे सगळं गुजरातमध्ये करा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारणच नाही. देवेंद्र फडणवीसांना दहा साहित्यिकांची नावं माहीत आहे का? साहित्यिकांना मराठी भाषेबाबत चिंता असती तर जो दबाव चालला आहे त्याबाबत साहित्यिकांनी आवाज उठवला असता. प्रकाश राज हा कलाकार बोलतो आहेच ना? नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित कुठे आहेत? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आणि मराठीवर असे हल्ले होत असताना तुम्ही गप्प बसता? फडणवीसजी आम्हाला साहित्यिकांबाबत काही सांगू नका, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.