‘मंत्रिपदं जाहीर झाल्यानंतर अनेकांना धक्का बसेल’; संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut | महाराष्ट्रात सध्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांना गृह आणि अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास भाजपाने विरोध दर्शविला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिपद नको, अशीही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात अडचणी येत असल्याची टीका आता विरोधक करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, की काही लोकांना मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रुग्णवाहिका तयार ठेवल्या पाहीजेत. एकनाथ शिंदे यांना आता कुणीही विचारत नाही. त्यांची नाराजी किंवा आनंद हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार हे कळसूत्री बाहुलीप्रमाणे असून ते गुलाम झाले आहेत. गुलामांनी बंडाची भाषा करायची नसते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. गुलामांना आपल्या हक्कांसाठी बलिदान द्यावे लागते. मात्र ही हिंमत यांच्यात नाही.
हेही वाचा – ‘वन नेशन इलेक्शन’च्या विधेयकावरुन प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले..
महाविकास आघाडीतील काही नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाचे नेते करत आहेत. यावरून संजय राऊत म्हणाले, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पोलीस, ईडीस, सीबीआय, आयटी अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते अशाप्रकारचे दावे करू शकतात. अशाप्रकारच्या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजपा आम्ही १५ मिनिटांत खाली केला असता.
भाजपाने मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी, निकालाची सुरुवात होताच अर्धे भाजपावाले देश सोडून पळून जातील. माझ्यासारखा माणूस कुणाला घाबरत नाही. आम्ही तुरूंगवास सहन केला आहे. रक्त सांडले, रक्त पाहिले असून आता आम्ही सभ्य झालो आहोत. सभ्य आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण जर कुणी महाराष्ट्राच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहे आणि पहिला हुतात्मा संजय राऊत असेल, असंही संजय राऊत म्हणाले.





