‘गुजरातच्या गांडाभाईची महाराष्ट्राला गरज नाही’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | अमित शहा यांनी औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात तंबू ठोकले तरी भाजप आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत. दिवसेंदिवस महाविकास आघाडीचा विजयमार्गच अधिक प्रशस्त आणि सरळ होत चालला आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काय आह हे दिल्लीतील भाजप नेत्यांना कळत नसेल आणि ते राज्यातील भाजप नेत्यांवर अजूनही गँबलिंग लावत असतील तर निकालांतर त्यांना कळेल की महाराष्ट्राच्या सत्तेवर त्यांनी अत्यंत बोगस आणि तकलादू माणसं बसवली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून ज्यांच्या हातात राज्याची सत्ता दिली, ते सत्ता चालवायला आणि राज्याचा विकास करायला अजिबात लायक नव्हते. शहांसारख्या लोकांचा हा हट्ट होता. औरंगजेबाचाही महाराष्ट्र काबिज करण्याचा, लुटण्याचा हट्ट होता. तसाच हट्ट घेऊन शहा महाराष्ट्रावर हल्ले करताहेत, पण मराठी जनता त्यांना चोख उत्तर देईल.
हेही वाचा – ‘धर्मवीर-3’ येईल, तेव्हा त्याची पटकथा मी लिहीणार; देवेंद्र फडणवीसांचं विधान
महाराष्ट्राला दादा, भाईंची गरज नाही. गुजरातमधून आलेल्या गांडाभाईची तर अजिबात गरज नाही. सत्ता, पैसा, केंद्रीय यंत्रणाता हातात आहे म्हणून हे भाई. ही सगळी आयुधं गळून पडल्यावर आमच्यासोबत भाईगिरी करा. विरोधकांना जेरबंद करण्यासाठी पोलीस, ईडी, सीबीआय यांचा गैरवापर केला तरी महाराष्ट्राने भाजपचा पराभव केला. एक दिवस ही सर्व आयुधं बाजुला ठेऊन समोर या. महाराष्ट्र सगळ्यांचा माज उतरवून देतो, तो आमचा धंदा आहे. देशाचे संरक्षण करणे आणि मार्जुड्यांचा माज उतरवून देणे हे महाराष्ट्राचे दोन पिढीजात धंदे आहेत, ही महाराष्ट्राची खासियत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
धर्मवीर-3 चित्रपटाची पटकथा मी लिहिणार असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा राऊत यांनी समाचार घेतला. आनंद दिघे काय होते हे आम्हाला माहिती आहे. ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते आणि आता त्यांना भाजपच्या मदतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण बाळासाहेबांचे समर्थक शिदेंना मानत नाहीत. त्यामुळे सिनेमाच्या माध्यमातून नवीन प्रतिकं निर्माण करायचे सुरू आहे. आनंद दिघे शिवसेनेचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख होते. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. शिंदेंपेक्षा राजन विचारे आणि आमचे अनेक लोकं दिघे साहेबांच्या जवळ होते. त्यामुळे धर्मविरांवर काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा त्यांच्या सारखी शिवसेनेच्या प्रति निष्ठा बाळगली असती तर असे सिनेमे काढून स्वत:चा डमका पिटवण्याची वेळ आली नसती, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.





