आम्ही एकत्र आलो, काका-पुतणे एकत्र आले तर..; संजय राऊतांचं विधान चर्चेत

मुंबई | राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडी करण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हा त्या दोन्ही पक्षांचा प्रश्न आहे. मात्र, जर आम्ही (ठाकरे गट आणि मनसे) एकत्र आलो आहोत, तर काका-पुतणे (शरद पवार आणि अजित पवार) एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही राजकीय दृष्ट्या आणि भावनिक दृष्टीने एकत्र आलो असू तर ते एकत्र आले तर त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पाठिंबा
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या सर्व महापालिकांबाबत आमची चर्चा पूर्ण झाली. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात महापालिकांबाबत काम करत असताना थोडा वेळ लागत असतो. पण विषय मुंबई महापालिकेचा आहे, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण युतीमध्ये काही नगरसेवकांच्या जागांची आदलाबदल होत असते, त्यामुळे थोडा वेळ लागतो. आता निवडणुकीसाठी उमेदवारांना एबी फॉर्मचं देखील वाटप सुरू करण्यात आलेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
युतीची अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी होईल, पण युतीची घोषणा म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षाच्या जागावाटपाची घोषणा करण्यात येईल. कारण युती झालेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व आम्ही सर्व एकमेकांशी संवाद साधून आहोत. आता एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती का झालेली नाही? अजित पवार आणि भाजपाची युती आतापर्यंत का जाहीर झालेली नाही? पण दुसरीकडे आमच्या शिवसेना आणि मनसेमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आम्ही मनापासून एकत्र आलो आहोत, आमच्यात जागावाटपाबाबत कुठेही ताणतणाव नाही, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.





