‘गणेश नाईकांनी लॉटरी शब्द वापरला, त्यांच्या डोक्यात मटका असेल’; राऊतांचा शिंदेंना टोला

मुंबई | ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वावरून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पालघर येथील एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी शिंदेंबाबत सूचक विधान केले की, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. गणेश नाईक यांच्या या खोचक टिप्पणीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली. शिंदेंना लॉटरी नाही तर मटका लागला होता, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, की गणेश नाईक शिवसेनेच्या १९९५ च्या पहिल्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा राजकारणात उदय झाला नव्हता, तेव्हापासून नाईक राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. नाईक संयमी नेते आहेत. एकेकाळी आमचे सहकारी होते. ते पक्ष सोडून गेले असले तरी आजवर त्यांनी शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका केलेली नाही. उलट आम्ही अनेकदा त्यांच्यावर टीका केली आहे. पण त्यांनी कधी पलटवार केला नाही.
गणेश नाईक काल म्हणाले की, शिंदेंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकारही एकेकाळी लॉटरी काढत असे. पण आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी आकडा मात्र लावला जातो. गणेश नाईक सभ्य आणि संस्कारक्षम नेते असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका असेल, असं संजय राऊत म्हणाले.
मटक्याचे आकडे सतत बदलत असतात. हे आकडे कुणालाही सांभाळता येत नाहीत. यांचा आकडा काढणारे दिल्लीत बसले आहेत. ते दिल्लीत जाऊन आकडा लावायचा प्रयत्न करत आहेत, पण आकडा लागत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.





