संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला
तोंडाला रक्त लागलं वर्षा बंगल्याचं, सत्तेचं की त्यांना ती शिकार सोडावीशी वाटत नाही.
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही यावर कालपर्यंत बराच सस्पेन्स कायम होता, मात्र अखेर काल संध्याकाळच्या सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याला पुन्हा दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. पण आता याच शपथविधी सोहळ्यावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती.. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, त्याशिवाय मी बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत ‘ असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. सरकारमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये आमचे हितचिंक असतात. त्यांच्या पक्षातसुद्धा, गटातसुद्धा हितचिंतक आहेत असेही राऊत म्हणाले. दाबदबावाचा अडेलतट्टूपणा असाच कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं, असा दावाही राऊत यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी अखेर काल ( 5 डिसेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडला. भाजपचे नेते आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवसी यांनी काल पुन्हा, तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीच्या विजयानंतर भाजपला मिळालेल्या सर्वाधिक जागा पाहता त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होतं. मात्र एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्रीपद तर गेलं पण गृहखातं तरी आपल्याला मिळावं यासाठी ते आग्रही होते, बराच काळ नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही यावर शेवटपर्यंत सस्पेन्स कायम होता.
मात्र अखेर काल संध्याकाळी महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि सगळ्या नाट्यावर पडदा पडला. मात्र आता संजय राऊत यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सत्तेचं रक्त लागल्यामुळे काहींना शिकार सोडावीशी वाटत नाही
सत्तेचं रक्त लागल्यामुळे काहींना शिकार सोडावीशी वाटत नाही असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. बहुमत गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला होता, पण ठाकरेंप्रमाणे वागायला काहींना जमत नसल्याने आदळआपट करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडलं. तोंडाला रक्त लागलं वर्षा बंगल्याचं, सत्तेचं की त्यांना ती शिकार सोडावीशी वाटत नाही. मा. उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावल्यानंतर त्यांना पदाला चिटकून राहणं योग्य वाटल नाही, तेव्हा त्यांनी तत्काळ राजीनाम देत वर्षा बंगला सोडला. त्यांना मोह नाही, पद मिळालं काम केलं. पद गेलं तर सत्ता सोडली आणि निघून गेले. पण हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमलं त्यांनी केली, ज्यांना जमलं नाही ते आदळआपट करत राहिले, ‘ अशी शब्दांत राऊतांनी शिंदेवर निशाणा साधत टीका केली.





