‘तुमचा पाळणा हलला नाही..’; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल देशभर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसला या कर्नाटकात बहुमत मिळालं आहे. तर भाजपाची पीछेहाट झाली आहे. काँग्रेसकडून भाजप आणि नरेंद्र मोदीवर टीका होत आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले की, लोक बदल करत असतात. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर निकाल देण्यासाठी नऊ महिने गेले. जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने सत्ताबदलाची संधी लोकांना दिली जाते, तेव्हा ते लोकशाहीच्या बाजूनेच निर्णय देत असतात. हे कर्नाटकमध्ये दिसलं. महाराष्ट्रातील समान्य लोक हे निकाल भाजपाच्या विरोधात देतील. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. खोट्या बातम्या पेरल्या गेल्या. पैशचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पण त्याला यश अलं नाही. तिथे जे घडलं, ते प्रत्येक राज्यात घडेल.
हेही वाचा – जयंत पाटील यांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस, २२ मे रोजी हजर राहण्याचे आदेश
महाराष्ट्र भाजपामध्ये या निकालानंतर अस्वस्थता आहे. शिवसेनेतून फुटलेल्या गटातही अस्वस्थता आहे. २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेत लोक भाजपाच्या विरोधात निकाल देतील. मूल जन्मलं एका ठिकाणी, बारसं दुसऱ्या ठिकाणी, असं रोहित पवार म्हणाले.
अनेक मोठे नेते कर्नाटकात गेले होते. महाराष्ट्रातल्याही मोठ्या नेत्यांनी तिथे प्रचार केला. तरीही भाजपा हरते. हा एक मोठा संदेश आहे. एवढी ताकद लावूनही कर्नाटकात लोकांनी काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला हे महत्वाचं आहे. त्यामुळे पाळणा कुठे, बारसं कुठे? असं बोलण्यात अर्थ नाही. पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात ना तिथे? फक्त तो तुमचा नाही हलला, लोकांनी लोकशाहीचा हलवला. त्यामुळे उगाच शब्दांत खेळू नका. महाराष्ट्रातली जनता एवढी सोपी-साधी नाही. संतांच्या आणि थोर व्यक्तींच्या विचारांनी त्यांची बुद्धी चांगली झाली आहे. योग्य निर्णय ते देतील. उगाच गंडवण्याचा प्रयत्न करू नका, असं रोहित पवार म्हणाले.