..तर तुतारी वाजवायला किती वेळ लागतो? अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्याचं विधान

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला फलटणमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी हातात तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेकदा माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर व भाजपा नेते जयकुमार गोरे यांच्याविरोधातील नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या दोन्ही नेत्यांची पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार देखील केली आहे. वरिष्ठांनी या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील काळात हाती तुतारी घेऊ, असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी तुम्ही तुतारीची चर्चा सुरू केली, मी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यांची (रणजीत नाईक निंबाळकर व त्यांचे साथीदार) दहशत रोखली पाहिजे. आपलं भारतीय जनता पार्टीशी कोणत्याही प्रकारचं भांडण नाही. आपण हिंदू-मुस्लिम वाद करत नाही, कोणी गाय मारली तर आपण त्याला संरक्षण देत नाही. आपली तक्रार एकच आहे, रणजीत सिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या साथीदारांनी फलटणमधल्या गल्लोगल्ली जी दहशत निर्माण केली आहे, त्यांचे जे प्रकार चालू आहेत, त्याविरोधात आपण तक्रार केली आहे. त्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी.
हेही वाचा – राज्यात नव मतदारांच्या संख्येत वाढ; सर्वाधिक महिला मतदार
आमचं एवढंच म्हणणं आहे की रणजीत निंबाळकर व त्यांच्या साथीदारांच्या दहशतीला भारतीय जनता पार्टीने सत्तेतून साथ देऊ नये. आपली एवढीच तक्रार आहे. ही तक्रार आपण वरिष्ठांना सांगून बघू. तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर तयारीने या. महिलांनी देखील यायला हवं. आपण वरिष्ठांशी चर्चा करू. एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि हा विषय संपवून टाकू. आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, आपल्या तक्रारीमुळे कोणताही फरक पडला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय. अजून काही बोलायचं बाकी राहिलं आहे का? असंही रामराजे म्हणाले.





