Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारणराष्ट्रिय

Ramdas Athawale । भाजपा महायुतीचे रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे!

पुणे: भाजपा महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या सर्वत्र विजय मिळवत आहे. या विजयात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र राज्यात महायुतीकडून भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, अशोक गायकवाड, सुनिल सर्वांगोड,  महेंद्र कांबळे, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, विनोद टोपे,  संघमित्रा गायकवाड, जयदेव रंधवे, विशाल शेवाळे, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, विरेन साठे, अनिल कांबळे, हकीम शेख, आसिफ सय्यद, चिंतामण जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्या. मुंबई महापालिकेत 17 ते 18 तर पुणे महापालिकेत 20 जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या, विशेषतः आमची नैसर्गिक युती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे, असेही आठवले म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेसाठी विस प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून ती भारतीय जनता पक्षाकडे सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी देण्यात आली आहे, असे आठवले यांनी सांगितले.

दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मियांना प्राधान्य देत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी देखील या आरोपात कोणतेही तथ्य नाही. मुस्लिम बोहरा, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अशा सर्व धर्मीय समाजाच्या हिताचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. मोदी हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे, असा दावा आठवले यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही मृतावस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर असताना भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. ती आता चौथ्या क्रमांकावर आली आहे. लवकरच की तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. याचे श्रेय निश्चितपणे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे आहे, असेही आठवले म्हणाले.

सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाचा आठवले यांनी समाचार घेतला. गोरगरिबांना उपयुक्त ठरणाऱ्या योजना राबवणे हा आमचा अधिकार आहे आणि ते आमचे कर्तव्य देखील आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडे सत्ता असताना त्यांना अशा योजना राबवता आल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या मतांमध्ये वाढ करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महार वतनाच्या जमिनीची सद्यस्थिती तपासून पहा

अमेडिया कंपनीकडून मुंडवा येथील महार वतनाची जमीन हडपण्याच्या प्रकाराबद्दल आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महार वतनाच्या जमिनी विकण्याचा अथवा विकत घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तरीदेखील राज्यभरात महार वतनाच्या अनेक जमिनी हडप करण्यात आले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमावी. या समितीने एका महिन्यात आपला अहवाल द्यावा. राज्य सरकारने स्थानिकांच्या हिताचा निर्णय या जमिनींबाबत घ्यावा. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले.

हेही वाचा: निवडणुका लढवायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, आमदार दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button