राज ठाकरे यांचे राज्यव्यापी दौरे सुरु
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरे सुरु केले आहेत. विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवण्याची घोषणा राज ठाकरे यांनी यापूर्वीच केली. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधून सर्वात मोठा निर्णय राज ठाकरे यांनी जाहीर केला. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात उमेदवार देणार का? त्यावरील पडदा राज ठाकरे यांनी स्वत:च उठवला. लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असणारे राज ठाकरे आता महायुतीच्या विरोधात निवडणुकीच्या रणांगणात असणार आहे. त्यासाठी ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातसुद्धा उमेदवार देणार आहेत.
सर्वच मतदार संघात उमेदवार देणार
नागपुरात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, २००९ मध्ये २३० ते २४० जागा आम्ही लढवल्या होत्या. यावेळी सव्वा दोनशे लढवणार आहोत. आदित्य ठाकरे यांच्या वरळीत ३७ ते ३८ हजार आमची मते आहेत. त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही उमेदवार देणार आहोत. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातसुद्धा उमेदवार आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले. सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहोत. मी स्वतंत्र लढणार आहे.
नागपुरात संघाचे मुख्यालय असून भाजप कधी वाढला?
आमचा पक्ष हळूहळू वाढत आहे. त्याची बांधणी होत आहे. लोक आता राज्यातील राजकारणाला कंटाळले आहेत. आता माझ्या हाती सत्ता देतील. नागपूर येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय आहे. परंतु त्या ठिकाणी काँग्रेसच्या जागा येत होत्या. भाजप १९५२ पासून बोलत होते, सत्ता येणार आहे. पण २०१४ला त्यांच्या हातात सत्ता आली. कोणत्याही गोष्टीसाठी वेळ लागतो. लोकसभेची वाफ संपली. आता विषय विधानसभेचा आहे. नागपूरसारख्या शहरातून अनेक तरुण माझ्या बरोबर यावे ही माझी इच्छा आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
बदलापूरच प्रकरण आता आले आहे. या लोकांना ठेचल पाहिजे. कठोर शासन व्हायला पाहिजे. त्यासाठी कायदे कठोर झाले पाहिजे. आता ज्यांनी बंद पुकारला होता, त्यांच्या काळातही अत्याचाराची प्रकरणे झाली होती आणि आज सुद्धा होत आहे. मात्र या घटना निवडणूक आल्यावर पुढे का येतात? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.





