राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केली आरक्षणाबाबतची भूमिका; म्हणाले, ‘माझ्या हातात राज्य आलं तर..’

मुंबई | महाराष्ट्रात इतक्या मुबलक गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली. तर, ओबीसी समाजाच्या संघटनेने थेट राज ठाकरेंची भेटच घेतली. राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे म्हणाले, मी जे बोललोय ते तुम्हाला आज समजणार नाही. अजून काळ जाऊद्यात. विधानसभेची निवडणूक होऊन जाऊदेत. ही निवडणूक झाल्यानंतर या गोष्टींचा अंदाज येऊल. राजकीय लोकांच्या लढाईचा विषय वेगळा आहे. ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे ते यातून साधून घेत आहेत. मी आज काय म्हटलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य इथल्या मराठी मलु-मुलींना महाराष्ट्रासारखी संधी कुठेच उपलब्ध नाही. महाराष्ट्रात आहे म्हणून बाहेरचे लोक येथे येत आहेत.
हेही वाचा – गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुडन्यूज, मध्य रेल्वे सोडणार 20 गणपती स्पेशल गाड्या
मागे मोर्चे निघाले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना. काय झालं त्याचं. १६ टक्के आरक्षण दिलं पण ते फसवं निघालं. हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसत आहेत, यापासून सावध राहा. जरांगे पाटलांच्या उपोषणाला मी आलो होतो. मी तेव्हाच बोललो होतो की तुमच्या मनातील गोष्टी होणार नाहीत. यांना फक्त राजकारण करून तुम्हाला वाऱ्यावर सोडणार आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय काय होईल, मागण्या मान्य होणार नाहीत. उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं तर महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं-मुली, आपला शेतकरी यावर जो पैसा खर्च व्हायला पाहिजे तो नको त्या लोकांवर खर्च होतोय. हे जे पूल आणि ब्रिज बांधले जात आहेत, ते कोणासाठी बांधले जात आहेत? जे संपूर्ण महाराष्ट्रात पैसे खर्च व्हायला पाहिजेत, ते चार राज्यामध्ये खर्च होत आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.





