‘एकाच नावाने अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष बाहेर’; राज ठाकरे यांचं विधान
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत अजित पवार यांनी बंडखोरी करत सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जो पक्ष सत्तेत आहे तोच पक्ष विरोधी बाकावर आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधीच पाहिली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जिथं दोन पक्ष सत्तेत आणि विरोधातही आहेत. एकाच नावाने अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा पक्ष बाहेर आहे. सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधी पक्षात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. बाहेर कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अशी परिस्थिती कधी जगात पाहिली आहे का? हे काय राज्य म्हणायचं का? नुसतं आपलं चालू आहे. दिवस ठकलत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता दहा चित्रपट पाहता येणार एकाच पासमध्ये
परवा कोकणात ब्रिज पाडला, मी परवाच बोललो की प्रत्येक ब्रिजचं दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. पण कोणाला काहीच पडलेली नाही. तुम्ही जागा किंवा मरा. फक्त मतदानादिवशी मतदान करा आणि मग तिथेच मेलात तरी चालेल. काय पण ब्रिज आणि फ्लायओव्हर बांधतात. लोकांची चिंताच नाही कोणाला. किशोर रुपचंदानीच्या इगल कंस्ट्रक्शनला १४० कोटींचा फ्लायओव्हर बांधायला दिला. तो पडला. एक दिवसाची बातमी होते, त्यानंतर पुढे काही बोललं जात नाही. संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागितला जात नाही. संबंधित मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की गणपतीसाठी एक लेन सुरू करतो. करोडो रुपये फुकट जात आहेत, रस्त्यांवर जीव जात आहेत. पण मतदान सुरू आहे देशात. तेच तेच निवडून येत आहेत. ज्या नागरिकांना राग येत नाही, त्यांचं काय करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
परशुराम आरोळी रस्त्याचंही त्यालाच काम दिलंय. मुंबईतील ९८० कोटींचं काम सुरू आहे. ज्यांच्या हातून ब्रिज पडत आहेत, रस्ते चांगले बांधले जात नाहीयत अशा लोकांना हजार, दोन हजार कोटींची कामे दिली जात आहेत. आम्ही फक्त हताशपणे बघत बसायचं. कायदा नावाची गोष्टच उरली नाही. भीती नावाची गोष्टच उरली नाही. रस्त्यावर खड्डे पडत आहेत, खड्ड्यांवरून गाड्या जात आहेत, पण राग येत नाही कोणाला. आत जे धुमसत आहेत ते एकदिवस बाहेर काढेन. इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले यांना त्या गोष्टीचे तर पाहा. तुर्तास या निवडणुकांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.